Thursday, November 24, 2011

चारोळी

साठवलेलं पाणी वाहत नाही म्हणतात....
पण हा नियम अश्रूंना लागू होत नाही...
कितीही बांध घाला, धरणं बांधा......
त्यांना वाहायला कधी, काही कारणही लागत नाही!!

Thursday, November 10, 2011

पहिला पाऊस

पहिला पाऊस!! येतांना
अनेक आठवणी घेऊन येतो....
आणि जातांना स्वतःलाच
आपल्या डोळ्यात साठवून जातो!

कागदाची होडी सोडतांना,
चिखलात भिजलेलं बालपण!
अन सरीवर सर झेलणाऱ्या,
मैत्रीतलं स्वच्छंदी तरुणपण!
आता तोच नकळत आपली नजर कशी...
दोरीवरच्या कपड्यांवर आणून ठेवतो?

"ये रे ये रे पावसा" म्हणत,
त्याला साद घालणारे आपण!
"चिंब पावसानं रान" ऐकत,
न भिजताच शहारणारे आपण!
आता 'अगोबाई-धागोबाई" चे,
बोबडे बोल ऐकण्यात कसे रमून जातो?

फक्त पाऊसच असतो असा,
सगळ्यांना सुखावणारा....
"रुटीन" मधल्या ताणाला,
एका क्षणात घालवणारा...
प्रत्येकाला आपल्या मनातल्या कुपीत,
एक चक्कर मारून आणणारा....
आणि तोच कसा जातांना स्वतःलाच,
आपल्या डोळ्यात साठवून जातो??