Sunday, September 19, 2010

आजीची आठवण

तुझ्यावर काहीतरी लिहावं
असं वाटत होतं कितीतरी दिवसांपासून
पण लिहायला बसलं की
आठवणींच्या पुरात मीच जायचे वाहून!

अश्रु पुसायला फक्त
एकाच गोष्टीची गरज असते
आणि त्या मायेच्या पदराची उणीव
सतत आम्हाला भासत असते!

तुझ्या स्वयंपाकाची सर
कधीच कशाला आली नाही
साधा तो दहीभात सुद्धा,
का गं
आता आम्हाला मिळणार नाही!!

आजीपेक्षा सुद्धा तू
माझी जवळची मैत्रीण होतीस,
फक्त मी कितीही चिडले-रुसले
तरी तू मात्र रुसत नव्हतीस!

पण आता मात्र तुझ्या रागावण्याची
अगदीच हद्द झाली
खरं सांग, तुला नाही का गं
आमची कधी आठवण आली?

अशा प्रश्नांची उत्तरे मिलणं
फार फार अवघड आहे
पण तरीसुद्धा एक गोष्ट
मला पक्की माहीत आहे,
जरी समोर नसलीस तरी
सतत तू आमच्या पाठीशी आहेस!
शरीराने बरोबर नसलीस तरी
मनाने कायम आमच्यातच आहेस!!

दिवाळी

दीपावलीच्या आगमनाने सर्वत्र
पसरतील रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा
पण मिटवू शकतील का त्या
दहशतवादाच्या अंधाराला?

विविध पदार्थांच्या सुवासाने
पाणी सुटेल तोंडाला
पण भागवू शकेल का हा फराळ
भ्रष्टाचाराच्या भुकेला?

फटाक्यांची दारु उडवून
मिळेलही आनंद काही जणांना
पण थोपवू शकेल का ही आतषबाजी
काश्मीर मधल्या असंख्य आसवांना?

चला तर मग सगळे मिळून
करू एकच प्रार्थना ईश्वराला
मिळूदे सुख, समाधान
शान्ति ह्या जगाला!!