Tuesday, September 27, 2011

विचार

विचारांना ह्या आपल्या
कधी कंटाळा का येत नाही?
'घ्यावी जरा विश्रांती',
असं कधीच कसं वाटत नाही?

दिवस असो की असो रात्र,

ना भान त्यांना वेळेचं
घरीच नाही तर बाहेरही....
ना बंधन त्यांना जागेचं...
कुठेही कधीही जायला,
त्यांना परवानगी का लागत नाही?

कधी हसू तर कधी आसू,

गाली आपुल्या रंगवतात...
बुद्धी आणि मनामधले,
वादविवादही घडवतात!
इतके कष्ट घेऊनही,
त्यांना थकवा कसा जाणवत नाही?

त्यांच्यावर कितीही रागावलो,

तरी साथ आपली सोडत नाहीत!
त्यांना दूर सारायचं म्हणलं तर,
आपल्यालाही ते सोडवत नाहीत...
त्यांच्याइतकं स्थितप्रज्ञ रहायला,
आपल्याला का कधी जमत नाही?

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.